डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

मुक्त विद्यालयात प्रवेश सुरु....

राज्यभरातील शाळा  सुटलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शालेय परीक्षेची संधी देण्यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाप्रमाणेच राज्यातही मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्यात आले आहे.



 मुक्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरू केली आहे. त्यासाठी येत्या 15 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. खरे तर या नावनोंदणीची मुदत 28 फेब्रुवारी होती. मात्र, ती 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. आता या मुदतवाढीला पुन्हा एकदा वाढ मिळाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ असेल. यामुळे पाचवी आणि आठवीसाठी नव्याने अर्ज करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. खरे तर महाविद्यालयीन मुलांना शिक्षणासाठी संधी मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. त्याच धरतीवर या विद्यालय मंडळाचाही कारभार चालतो.

काय असणार पात्रता?

राज्याच्या मुक्त मंडळात 14 वर्षांखालील मुलांची नियमित विद्यार्थी म्हणून नोंद केली जाते. दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी हे आठवीच्या परीक्षेस बसू शकणार आहेत. तर पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेसाठी बसू शकणार आहेत. सध्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

कशी होईल प्रक्रिया?

राज्याच्या मुक्त मंडळातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 1 ते 15 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे विद्यार्थ्यांनी संबंधित केंद्रावर जमा करावयाची आहेत. ही प्रक्रिया 4 ते 8 एप्रिल 2022 दरम्यान पूर्ण करता येणार आहे. संपर्क केंद्र शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी मंडळात जमा करण्यासाठी 22 एप्रिल 2022 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.

थोडक्यात, पण महत्त्वाचे…

– 15 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येईल.

– विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करता येईल.

– 10 वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी 8 वीची परीक्षा देऊ शकतील.

– 15 वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी हे 10 वीच्या परीक्षेसाठी बसू शकतील.

– अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://msbos.mh-ssc.ac.in

उन्हाळी सुट्टी घोषित..... पहा सविस्तर

 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते ९ वी व इ. १२ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या .



 संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून पुढील

प्रमाणे शासन निर्णय / परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

 १) सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.


२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी तो समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.


(३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात सांगण्यात आले.


४) आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुस-या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विधाता जून महिन्यातीलचसोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल शाळा सुरू होतील.


 उपरोक्त बाबी विचारात घेवून वरील प्रमाणे उन्हाळी सुट्टी बाबत शासन निर्णय/

परिपत्रक पहा.... Click here



राज्यातले सर्व निर्बंध गुढीपाडव्याला उठणार...

 महाराष्ट्रातही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला होणाऱ्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे



गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. असे मुख्यमंत्री म्हणाले. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचसोबत मास्क घालणं ऐच्छिक असेल. त्यावर कुठलीही सक्ती केली जाणार नाही असं राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.