डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिरूर तालुक्यातील सध्या गाजत असलेल्या प्रकरणी दोन शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन|teachers-suspension-teachers-jobs|

 शिरूर तालुक्यातील शिक्षणशत्रूंच्या हस्तक्षेपामुळे तक्रारी, चौकशी व निलंबने याबाबत कायमच *साशंकता* …

                              *- वारे गुरुजी*


शिरूर तालुक्यातील सध्या गाजत असलेल्या प्रकरणी दोन शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि व्यक्त व्हावे वाटले म्हणून हा शब्द प्रपंच… सध्याचे प्रकरण चौकशी पातळीवर असल्याने त्याबद्दल मी कोणतेही भाष्य करणार नाही, मात्र माझ्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यातील काही विसंगत गोष्टींच्यावर मात्र बोट ठेवण्याची माझी भूमिका आहे. 

        कारवाई काय होते व वर्तमानपत्रात काय छापून येते याचा मूळ प्रकरणाशी काहीही संबंध नसतो. (कारण दबावामुळे व्यवस्थेची आणि काही नादान लोकांमुळे चौथ्या स्तंभाची अवस्था फारच केविलवाणी झालेली आहे) त्यामुळे त्या संदर्भाने कोणीही आपापली मते बनवू नयेत हे मी आवर्जून सांगेन. तसेच कोणी आरोप केला अथवा कुणावर कारवाई झाली म्हणून सदर व्यक्ती दोषी असतोच असे अजिबात समजू नये व अशा काळात त्या व्यक्तीपासून अंतर ठेवून वागू नये. शिक्षक म्हणून ते आपल्याला अजिबात शोभनीय नाही. फोन करून आधार द्यायचा असल्यास रेगुलर कॉल करावा, *व्हाट्सअप कॉल करू नये.* आणि जवळचे


संबंध आहेत भेटायला जावेच लागेल असे वाटत असल्यास दिवसाढवळ्या भेटावे, *रात्रीचे भेटू नये.* अशा वेळीच माणसाची खरी पारख होत असते हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्य किंवा असत्य सिद्ध करण्याची प्रक्रिया चौकशी दरम्यान होईलच आपण कोणताही अंदाज बांधू नये. आपण अशावेळी चुकल्यास व कच खाल्ल्यास आपण आयुष्यभर *अपराधी* होतो हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे कारण अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. 

        आपल्या कचखाऊ वागण्याने अन्याय करणाराला बळ मिळते व ज्या प्रवृत्ती समाजातून *संपवून* टाकायला पाहिजे त्या विनाकारण बलिष्ठ होत जातात. आणि अजून एक सांगतो  *…ब्रह्मराक्षस हा भित्यापाठीच लागतो… निर्भय मात्र ब्रह्मराक्षसाच्याही पाठीमागे लागू शकतो…* (संकट तुम्हाला अधिकाधिक *निर्भय, व्यापक, अचूक, टोकदार व स्पष्ट* बनवत असते हे मी खात्रीने सांगू शकतो)


संशयाच्या जागा…

1. या प्रक्रियेत शिक्षण विभागाचा कोणताही रोल दिसत नाही. माझ्यावेळीही असेच झाले होते. कोणताही आणि कोणाचाही तक्रार अर्ज प्राप्त नसताना तत्कालीन बीडिओ यांनी शिक्षण विभागाला कोणतीही कल्पना न देता परस्पर शाळेत येऊन चौकशी करून अतिशय विसंगत असा प्राथमिक अहवाल दिला होता. तो प्राप्त अहवाल आजही अहवालकर्त्याला घरी पाठवण्यासाठी पुरेसा आहे.


2. याप्रकरणी प्रशासकीय प्रक्रिया होण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने एकच बाजू मांडणारी पेपरबाजी सुरू आहे यावरून शंका वाटते की हे ठरवून केलेले षडयंत्र तर नसेल? कारण माझ्या प्रकरणाच्या वेळीही प्रशासनाने काय केले पाहिजे या बाबी अगोदर पेपर मध्ये छापून यायच्या व नंतर त्याच पद्धतीने कारवाई व्हायची… त्यावेळी दोन पत्रकारांनी पॅकेज (पक्षि सुपारी) घेऊन हा अजेंडा राबवलेला होता. मीडिया बद्दल कोणालाच विश्वास राहिला नाही याला अशीच माणसे कारणीभूत आहेत. 


3. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना तक्रारीनंतर कारवाई करण्याच्या अगोदर कोणतीही नोटीस दिलेली नाही अथवा त्यांचा खुलासा घेतलेला नाही असे कळते. आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला घटनेने दिलेला अधिकार आहे. त्याची बाजूच ऐकून न घेता कारवाई करणे म्हणजे त्याचा *नैसर्गिक न्यायाचा हक्क* डावलने असा अर्थ होईल. 


4. इतकी सरळ व सोपी बाजू संख्येने *अनंत* असलेल्या शिक्षक संघटनांच्या लक्षात येत असेलच, मात्र तरीही या प्रकरणी त्या गप्प आहेत. याचा अर्थ माझ्या प्रकरणावेळी त्यांना ज्या पद्धतीने धमकावून गप्प बसवण्यात आले होते, तसेच आत्ताही झाले असावे अशी मला शंका आहे. संघटनांकडून वारंवार असे होत असेल तर त्यांच्या अस्तित्वावरच टाच येईल. मुळात *शिक्षकांचे अन्यायापासून संरक्षण व विद्यार्थ्यांची गुणवत्ता* ही दोनच कामे संघटनेने केली पाहिजेत. मात्र प्रत्यक्षात काय चाललंय हे जरा जाणकारांनी पाहिले पाहिजे. शिरूर तालुक्यातील संघटनांनीही जर अन्यायापासून शिक्षकाचे संरक्षण करता येत नसेल, त्याच्यासोबत उभे राहता येत नसेल तर ही मक्तेदारी सोडून द्यावी व आपापली दुकाने बंद करावीत.


5. कैलास गुरुजी पूर्वी खेड मध्ये नोकरीला होता तेव्हा गावातल्या एका तरुणाला सर्पदंश झाल्यावर त्याला पाठीवर घेऊन नदीपार पोहून उपचारासाठी घेऊन गेला होता व त्या तरुणाचा जीव वाचवला होता. ही आठवण खेडमध्ये सर्वजण आवर्जून सांगतात. तर महेश गुरुजी हा अत्यंत पापभीरू व सरळ व्यक्ती आहे याचीही सर्वांना माहिती असताना संघटनांची भूमिका मला अनाकलनीय वाटते. तुम्ही त्यांचे बरोबरच आहे असे म्हणू नका. मात्र योग्य पद्धतीने चौकशी व योग्य पद्धतीने कारवाई व्हावी असा आग्रह धरायला संघटनांना कोणाच्या बापाची भीती वाटते?...  सत्य-असत्य कालांतराने समोर येईलच पण जाब विचारण्याची हिंमत हरवून बसू नका. नाहीतर आपले अस्तित्व संपेल एवढीच सूचना वजा विनंती करतो. माझ्या प्रकरणी मला मिळालेल्या *क्लीन चिट* नंतर आपण वारे गुरुजीची बाजू घ्यायला पाहिजे होती असे संघटनांच्या मनात येऊन गेले असेल अशी मी आशा बाळगतो. मला त्यावेळी महाराष्ट्रभरातून जो अभूतपूर्व पाठिंबा मिळाला त्या पार्श्वभूमीवर शिरूर मधील संघटनांची उणीव मात्र ठळकपणे दिसत होती. असे बोलताना मी त्यांच्या मदतीची अपेक्षा करत होतो असे अजिबात नाही, मात्र शिक्षकांची संघटना म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना मी ज्या सिस्टीमचा भाग आहे ती सिस्टीम कालबाह्य, कुचकामी, हतबल व भयग्रस्त अवस्थेत सापडली आहे याचे मला फार दुःख होत होते आणि आजही होते आहे.


6. प्रशासनाची अशा प्रकरणांमध्ये कशी गोची होते हे मी माझ्या प्रकरणाच्या वेळी अनुभवलेले आहे. कोणीतरी उपटसुंभ प्रशासनाला सभागृहात विषय उपस्थित करण्याची धमकी देतो आणि मग विनाकारण त्रास नको म्हणून प्रशासन त्याची मर्जी राखण्यासाठी (अथवा मोगॅम्बोला खुश करण्यासाठी) खालच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा देऊन मोकळे होते. (याप्रकरणीही असेच काही झाल्याचे कानावर पडत आहे) मला तर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी “आमच्यावर प्रेशर आहे आम्हाला समजून घ्या” अशा शब्दात स्वतःच्या हतबलतेची व अक्षमतेची कबुली दिली होती.


7. आजवर या दोन्ही शिक्षकांबद्दल अथवा त्या शाळेबद्दल एकही वाईट शेरा नसणे… त्यादिवशीच्या शाल श्रीफळ देऊन केलेल्या सत्काराचे आणि गावकऱ्यांसोबतच्या चहापाण्याचे फोटो ग्रुप वर फिरत असणे…त्यादिवशी शाळेला दिलेल्या उत्कृष्ट अशा अभिप्रायाचे फोटो असणे… आणि या पार्श्वभूमीवर जी कारणे बातम्यांमध्ये दाखवली जात आहे व त्या शिक्षकांना निलंबित केले जात आहे हा खरं तर चक्रावून टाकणारा घटनाक्रम वाटतो.


8. चाणक्य म्हणाला होता… *शिक्षक कभी सामान्य नही होता, सृजन और विनाश दोनो उसके गोद मे पलते है।…* आपण शिक्षक या पदाने चाणक्याचे वंशज आहोत हे विसरायला नको. अगदी चाणक्य सोडा, जरा जुन्या शिक्षकांचा कानोसा घ्या सासवडे गुरुजी, ढमढेरे गुरुजी, निचीत गुरुजी, थोरात गुरुजी आशा जुन्या शिक्षकांच्या काळात शिरूर तालुक्याचे राजकारण फिरवण्याची हिंमत शिक्षकांमध्ये होती. आता मात्र आपल्याला बोटावर खेळवलं जातय. हीन , दुर्लक्षित समजून आपला कचरा केला जातोय हा विरोधाभास मला तर अस्वस्थ करतो… इतरांचे मला माहित नाही. आपल्याला जसे विस्मरण झालेय तसं कदाचित समोरच्यांनाही त्या काळाचे विस्मरण झालेलं दिसतंय. एकदा एखाद्याला जागा दाखवली पाहिजे म्हणजे परत बराच काळ सर्वांच्या स्मरणात राहील.


आपल्या भूमिकेने फिर्यादी, आरोपी, प्रशासन व पडद्यामागचे खरे सूत्रधार यांना काही फरक पडेल अशी अवाजवी अपेक्षा आपण ठेवण्याचा हा काळ नाही. तशी अपेक्षा न ठेवता आपल्याला जे दिसते, पटते अथवा वाटते त्यावर व्यक्त झाले पाहिजे व आपल्यातला *टायगर (शिक्षक)* मेलेला नाही हे आपण दाखवून दीले पाहिजे.

4 Comments:

DINESH JAKKAR म्हणाले...

हा शिक्षकांवर होणारा अन्याय आहे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. यासठी संघटनांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. आपण हिंमत न हारता लढत राहिले पाहिजे.

अनामित म्हणाले...

पुर्णपणे सहमत.

Smart classmate म्हणाले...

काही लोक स्वतःला बॉस समजत असतात..त्यांना शिक्षकांकडून उचित मान सन्मान मिळाला नाही की ते कांगावा करतात.विनाकारण तक्रारी करतात,राजकारण करतात आणि चांगल्या शिक्षकांना वेठीस धरतात.अश्या लोकांमुळे शिक्षकांना सतत दडपण ग्रस्त राहावे लागते.शिवाय काही शिक्षक पण अश्यांच्या मागे हां भाई हां भाई म्हणतं फिरणारे असतात.घर का भेदी लंका ढाये.

अनामित म्हणाले...

आपण शिक्षक आहोत हा स्वाभिमान संघटनेत राहिला नाही. स्वार्थी प्रवृत्ती वाढत चालली त्यामुळे तुम्ही जे लिहिले त्यास मी सहमत आहे.