डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Essay writing निबंध लेखन #essay

"मी.... मी कचरा बोलतोय !!!...."


उडून जातो कधी वाहून जातो नाहीतर धूर बनून उंच आभाळी ही जातो.....माझ्या अशा अवस्था होतात बरं का? 
    खूप दिवसांनी मन हलके करायचे होते ,आज संधी भेटली तेव्हा मांडावी वाटली माझीही व्यथा.....
    मी दुसरा तिसरा कोणी नव्हे तर मी आहे कचरा...... हो मी आज माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद साधत आहे. माझा जन्म कसा होतो ते सांगतो . तुम्ही मला खूप आवडीने विकत आणता मग काही दिवसाचे कौतुक ही करता.... गरज सरो व वैद्य मरो असंच माझं ही होऊन जाते. लवकरच हवा हवासा असलेला मी नकोसा होतो व मग मला माझ्या या अवतारात जन्म मिळतो तो म्हणजे कचरा.....
         माणुस असा प्राणी आहे तो अल्पसंतुष्ट राहतो. तो कित्येकदा नविन वस्तुच्या हव्यासा पाई चांगल्या वस्तूंना फेकने सुरु करतो. मग भेटेल त्या जागी नको असलेल्या वस्तूना फेकून जातो.
     मानवात असलेली ही कला तर नाही ना?   कलेच्या जोरावर अनेकविध वस्तूची निर्मिती करु शकला हे मात्र खर आहे. पृथ्वी तलावरील लाखो जीवात म्हणून तर श्रेष्ठ बनून आहे. 
      अग्नीच्या शोधापासूनच तर सुरु झाला निसर्ग पतनाचा सारा काही खेळ.आज निर्माण झालेले वायुप्रदुषण उच्चतम स्तरावर येऊन पोहचले आहे. त्यात भर पडते ती म्हणजे मला जाळून निसर्गात माझ्या नकोशा विषारी अवतारास वायु स्वरूपात मिसळून निष्पाप जीवांच्या श्वसनात माझा न कळत प्रवेश होऊन जातो.
    विपरीत असे घडत जाते मी फक्त पहात राहतो. पावसाळा हा ऋतू खरं तर धरणीच्या बहरण्याचा ऋतू परंतू मला कित्येक ओढे, नदी यात मुक्त पोहण्यास टाकून दिल्या जाते.  जल यही जीवन मग मी ही त्यात मिसळून माझे अस्तित्व टिकवून तग धरून स्वतःला सारत  राहतो. 
      होवो किती हा समर,
    कचरा मी आज येथे अमर....
माणसाकडे वेळ नाही म्हणून तर माझे आज साम्राज्य वाढत आहे. घाईघाईने  कुठेही कसेही मला टाकले म्हणजे तो जबाबदारीतून मुक्त होऊन लगबगीनं निघतो परत नव्या उठावास....
     खरं तर मी माझ्या या अवस्थेला खूप कंटाळून गेलोय माझ्या मुळे निष्पाप जनावरेमाझे  प्लास्टिकचे रुप खाऊन मरत आहेत. माझ्या धूराने पर्यावरण दूषित होऊन निसर्ग हानी होत आहे. असंख्य नाले तुडुंब भरून वाहने थांबून जात आहेत. नको नको असलेल्या स्वरूपात मला राहून या भुतलावर असह्य त्रास सोसावा लागत आहे.
  मानवी जीवन आज कचरा स्वरूपाने सर्वत्र व्यापून गेलेले आहे.त्याच्या प्रत्येक कृतितून निरंतर कचरा रुपाने आमचा जन्म होत आहे. विराट असे आमचे होणारे साम्राज्य पाहून निसर्ग आज चिंतेत पडला असणार यात तिळमात्र शंका नाही. 
      मानवाने फक्त  एकच करावे ते म्हणजे कचरा टाकातांना ओला , सुका वेगळा करावा इलेक्ट्रॉनिक्स, औषधी रसायने याचे ही योग्य वर्गिकरण करुन. घंटा गाडीत मला पाठवावे व तेथून मला समृद्धीच्या वाटेवर पोहचवावे. मी कंपोस्ट बनून निसर्गात शिवारात वनस्पतीमध्ये डोलू  लागेल. प्लास्टिकचे पुनर्रवापर होऊन मला परत कलात्मकता मिळेल.मानवी जीवन भरभराटीचे होतांना सोबत जीव सृष्टीचे ही जतन होणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. ही वसुंधरा सदैव पृथ्वी स्वच्छ व निर्मळ राहीली आहे व तिचे सुंदर रूप कधीही कमी होऊ नये . करोडो जीवांना येथे आधार मिळत आहे. तो कधी हिरावून जाऊ नये. यासाठी संपुर्णता मानवाचे दायित्व बनते की त्याने यासाठी निश्चित सकारात्मक पुढाकार घेऊन होणारी ही विनाशाची शृंखला खंडित करावी. 
व्यथा तर मांडली पण जाता जाता परत एक सांगून जातो. 

फुलेल परत धरती ही परत आनंदाने ,
विल्हेवाट कच-याची योग्य लावल्याने,
माणसा सोड रीत तुझी सदा फेकण्याची,
कर वर्गीकरण आमचे नांदेल तु सुखाने.....



निबंध लेखन 
प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 
सहशिक्षक 
जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,
औरंगाबाद 
9960878457 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: